“पाटील आधी चंद्रावर होते. मात्र टीका झाल्यानंतर ते…”; पडळकर पुन्हा बरळले

0
236

मुंबई, दि.२९ (पीसीबी) : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मंगळवारी बीड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी दिवसभर बीड जिल्ह्यातील केज येथे अतिवृष्टी झालेल्या विविध गावांना भेटी दिल्या व पूरपरिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर संध्याकाळी परळीमध्ये पाटलांचं फुलांचा वर्षाव करून जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती, अशी भावना जयंत पाटलांनी व्यक्त केली होती. तर पाटलांच्या जंगी स्वागतानंतर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे.

“पाटील आधी चंद्रावर होते. मात्र टीका झाल्यानंतर ते पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बांधावर गेले, अशी खरमरीत टीका पडळकरांनी केली आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पाहणी केली. परळी, अंबाजोगाई व केज तालुक्यात भेटी देऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. तसेच मांजरा प्रकल्पाचे जवळपास पूर्ण दरवाजे उघडल्याने नदीला पूर आला आहे व त्यामुळे पुढील अनेक गावे प्रभावित झाली आहेत, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.