“नोटाबंदीच्या घिसाडघाईबद्दल केंद्राने देशाची माफी मागावी” ; राऊतांची आग्रही मागणी

0
271

मुंबई, दि.०८ (पीसीबी) : नोटाबंदीला पाच वर्षपूर्ण झाली आहेत. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. नोटाबंदीच्या घिसाडघाईबद्दल केंद्र सरकारने देशाची माफी मागायला हवी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना ही मागणी केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर आज पाच वर्षात काश्मीरमध्ये सर्वाधिक दहशतवाद वाढला आहे. याच पाच वर्षात देशात सर्वात जास्त काळापैसा वाढला आहे. त्यामुळे नोटाबंदी पूर्ण अपयशी ठरली आहे. नोटाबंदीचा निर्णय हा आर्थिक डिजास्टर होता. नोटाबंदी झाल्यावर शेकडो लोकांना नोकरी आणि प्राण गमवावा लागला होता. त्यामुळे नोटाबंदीच्या घिसडघाईबद्दल केंद्र सरकारने देशाची माफी मगाायला हवी, असं राऊत म्हणाले.

भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी महाराष्ट्रातून केंद्र सरकार उखडून फेका असं आवाहन केलं आहे. नड्डा यांच्या आवाहनाची राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. जेपी नड्डा सदगृहस्थ आहेत. चांगले नेते आहेत. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचं सरकार उखडून फेका. त्याच्याआधी त्यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये चीन जे घुसलं आहे आणि चीनने आपल्या हद्दीत गावं बसवली आहेत. त्यांनी सर्वात आधी अरुणाचलप्रदेशातून चीनला उखडून फेकलं पाहिजे. जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले वाढले आहेत. अतिरेक्यांचे अड्डे वाढले आहेत. त्यांना ताबडतोब उखडून फेकलं पाहिजे, असं आव्हानच त्यांनी केलं.

भाजपची भूमिका समजू शकतो. महाराष्ट्रात प्रयत्न करूनही भाजपला आघाडीचा बालही बाका करता आला नाही. इतकं मोठं राज्य, केंद्रीय सत्ता, संपूर्ण केंद्रीय यंत्रणा हाताशी धरून दहशत, दबाव आणि पैसा याचा वापर करूनही सरकार पडत नसेल तर वैफल्य येणं हे स्वाभाविक आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. राष्ट्रीय सुरक्षेसाठी अरुणाचलमधून चीनला आणि काश्मीरमधून अतिरेक्यांना उखडून झालं की मग भाजपने पूर्णपणे महाराष्ट्राकडे वळावं आणि राजकीय उखडबाजी जी काही आहे जरूर करावी. राजकारणात लोकशाहीत एखादं सरकार लोकशाही मार्गाने हटविण्याचा अधिकार दुसऱ्या पक्षाला आहे. पण उखडण्याची भाषा करत असाल तर सीमेवर जी लोकं घुसली आहेत आणि गावंच्या गावं बसवली आहेत, चीनने त्यांना उखडण्यासाठी काही करता येत असेल तर देश त्याविषयी समजून घ्यायला उत्सुक आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.