धक्कादायक: मोबाईल काढून घेतल्याच्या रागातून मुलाने केले बापाचे तुकडे

0
798

बेळगाव, दि. ९ (पीसीबी) – वडिलांनी मोबाइल काढून घेतल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या वडिलांचाच विळीने वार करुन खून केला. क्रुरतेचा कळस म्हणजे खून केल्यानंतर त्याने वडिलांचे हात, पाय आणि मान देखील कापली. ही धक्कादायक घटना आज (सोमवार) पहाटे पाचच्या सुमारास बेळगाव जिल्ह्यातील, सिद्धेश्वरनगर, काकती येथे घडली.

शंकर देवाप्पा कुंभार असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. ते जिल्हा सशस्त्र दलात पोलीस अधिकारी होते. तीन महिन्यापूर्वीच ते सेवानिवृत्त झाले होते. तर रघुवीर कुंभार असे त्यांचा खून करणाऱ्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरापर्यंत रघुवीर हा मोबाइलवर गेम खेळत होता. यामुळे शंकर यांनी रघुवीर याला झोप म्हणून सांगितले. मात्र रघुवीर अयकत नसल्याने शंकर यांनी त्याचा मोबाईल काढून घेतला. त्यामुळे संतापलेल्या रघुवीरने आजूबाजूच्या घरावर दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडल्या.

शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवल्यावर पोलिसांनी रघुवीर आणि पालकांना पोलीस ठाण्यात बोलवून समज दिली. रात्री घरी येऊन मग ते झोपले. मोबाइल घेतल्याचा राग डोक्यात ठेऊन रघुवीर झोपला होता. उठल्यानंतर त्याने आईला घरातील एका खोलीत कोंडून ठेवले. त्यानंतर घरातील विळी घेऊन वडिलांची हत्या केली. हत्या केल्यावर त्याने वडिलांचे हात, पाय आणि मान कापली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत रघुवीरला अटक केली. पोलिसांनी अटक केल्यावर त्याने, “मला वडिलांच्या मृतदेहाचे आणखी तुकडे करायचे होते”, असे सांगितले. दरम्यान, रघुवीर हा तीन वेळा डिप्लोमा परीक्षेत नापास झाला होता. तो कोणतेही काम करत नव्हता. काकती पोलीस अधिक तपास करत आहेत.