दिघी आळंदी रस्त्यावरील वाहतूक नियंत्रक दिवे कार्यान्वयीत करा : नगरसेवक विकास डोळस

0
154

 सहायक पोलीस आयुक्त नंदकिशोर भोसले-पाटील यांना मागणी

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या दिघी आळंदी रस्त्यावर असणारे वाहतूक दिवे (सिग्नल यंत्रणा) गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. वारंवार तक्रारी करून देखील महापालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे हे दिवे सुरू झालेले नाही. प्रशासनाचा हा गलथान कारभार एखाद्या नागरिकाच्या जीवावरही बेतू शकतो याची खबरदारी प्रशासनाने जरूरी झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक नियंत्रक दिवे तात्काळ कार्यान्वयीत करावेत, अशी मागणी भाजपा नगरसेवक विकास डोळस यांनी केली आहे.

याबाबत वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त नंदकिशोर भोसले- पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, आळंदी-पुणे पालखी महामार्गावरील दिघी ते आळंदीपर्यंत महापालिकेने रस्त्यावर बसविलेले वाहतूक नियंत्रक दिवे गेल्या काही दिवसांपासून बंदच आहेत. अनेकदा तक्रारी करूनदेखील महापालिका प्रशासन ढिम्म आहे. या रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने वाहनांचा वेग वाढला आहे. तर वाहतूक नियंत्रक दिवे बंद असल्याने प्रत्येक जण पुढे जाण्याची घाई करत असतो आणि यातून वादावादीचे प्रकार देखील घडतात. समोरचे वाहन जाऊ देण्यासाठी थांबावे, अशी कोणाचीच भूमिका नसते या कारणावरून सर्वच ठिकाणी वाद होत आहेत. दरम्यान सिग्नल धूळखात पडले आहेत. येथे स्पीडब्रेकर नसल्याने या मार्गावरील भरधाव वाहने बीआरटी कॉरिडॉरला धडकून अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. या रस्त्यावरील वाहनांचा वेग मर्यादित असावा, यासाठी प्रशासनाने या मार्गावर दोन दिवसांपूर्वीच नव्याने स्पीड ब्रेकर बसविले आहेत. मात्र, वाहतूक नियंत्रक दिवे सुरू करण्यासाठी कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे चित्र आहे.

पुणे- आळंदी रस्ता हा राज्य शासनाने घोषित केलेल्या तीर्थक्षेत्रात येणारा एक महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावर कोट्यवधीचा खर्च करून उभारण्यात आली त्यावर दिवे देखील बसवण्यात आले मात्र हे दिवे केवळ शोभेपुरते आहेत का असा वाहनचालकांचा प्रश्न आहे. दिवे बंद असल्याने या मार्गावर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. दिघी ते काळेवाडीदरम्यानच्या दिघीपासून आळंदीपर्यंत चौक, अलंकापुरम चौक, चन्होली फाटा येथे वाहतूक नियंत्रक दिवे बसविले आहेत. मात्र, गेल्या चार-पाच वर्षांपासून ते बंदअवस्थेत आहेत. वर्षभरात क्वचित दिघीतील विठ्ठलमंदिराजवळचा दिवे सूरू दिसतात. त्यामुळे त्याकडे लक्ष देऊन वाहतूक नियंत्रक दिवे सुरळीत करावे, अशी मागणीही नगरसेवक विकास डोळस यांनी केली आहे.