जालना, दि. ९ (पीसीबी) – अर्जुन खोतकर आणि माझ्यात निवडणुकीपूर्वी दोन महिने अगोदरच सेटलमेंट झाली होती, नंतर फक्त नाटक होती, असा गौप्यस्फोट केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी आपल्या भाषणात केला होता. यावर अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया देत दानवे हे भाषणाच्या ओघात बोलले असतील, असे म्हटले आहे.
दानवे जे बोलले ते चुकीचे होते ते वाक्य टाळता आले असते, तर बरे झाले असते, असेही खोतकर यांनी म्हटले आहे. आमच्यात मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या मध्यस्थीने मनोमिलन झाले असल्याचे सांगत दानवे यांच्या या वक्तव्याची उद्धव ठाकरे यांनी विचारणा केल्याचे देखील खोतकरांनी म्हटले आहे.
अर्जुन खोतकर आणि आमच्यात निवडणुकीच्या दोन महिने अगोदर सेटलमेंट झाली होती. नंतर फक्त नाटक सुरु होते, असा गौप्यस्फोट केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला होता. जालना येथे रावसाहेब दानवे यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सर्वपक्षीय नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी दानवेंनी आपल्या भाषणात हे विधान केले होते.