इस्लामाबाद, दि. २५ (पीसीबी) – भारताविरोधात पाकिस्तानने पहिला अण्वस्त्राचा वापर केला, तर भारत २० अणूबॉम्ब टाकून पाकिस्तानला संपवून टाकेल, असे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी म्हटले आहे. भारत-पाकिस्तानमध्ये धोकादायक संबंध तयार झाले आहेत. दोन्ही देश अण्वस्त्रांचा वापर करणार नाहीत, असेही मुशर्रफ यांनी म्हटले आहे.
मुशर्रफ संयुक्त अरब अमिरातीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानने भारतावर पहिला हल्ला करावा, हा एकमेव तोडगा आहे. पाकिस्तानने भारतावर ५० अणूबॉम्ब टाकले, तरच भारत २० अणूबॉम्ब वापरण्याच्या स्थितीमध्ये राहणार नाही. तुम्ही पहिला अण्वस्त्र हल्ला करण्यासाठी तयार आहात का? असा सवाल मुशर्रफ यांनी केला.
दरम्यान, पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात कुठल्याही भावना नाहीत. त्यांच्यामध्ये कुठलीही आग नाही, असा आरोप मुशर्रफ यांनी केला . पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो, हा भारताचा आरोप त्यांनी फेटाळून लावला .