“….तर पुन्हा पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करायला वेळ लागणार नाही”; गृहमंत्री शाहांचा पाकिस्तानला रोखठोक इशारा

0
252

पणजी, दि.१४ (पीसीबी) : पाकिस्तानातून होणारी घुसखोरी थांबली नाही आणि काश्मीरमध्ये अशाच प्रकारे सामान्य नागरिकांवर हल्ले होत राहले तर पुन्हा पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करायला वेळ लागणार नाही असा इशारा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानला दिला आहे. गोव्याच्या धोरबंदोरा इथल्या नॅशनल फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी माजी संरक्षण मंत्री स्वर्गीय मनोहर पर्रिकर यांचीही आठवण काढली. जनतेला संबोधित करताना अमित शाहा म्हणाले की, ” मोदींच्या नेतृत्त्वात आणि पर्रिकर असताना पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्याचा निर्णय घेण्यात आला. कित्येक वर्षांपासून सीमा पार करुन आक्रमणकारी इथं येत होते. वेगवेगळ्या प्रकारच्या घटना करत होते, दहशतवादी कारवाया करत होते, आणि दिल्ली दरबारातून निवेदनाशिवाय काहीही होत नव्हतं.

मात्र जेंव्हा पुंछमध्ये हल्ला झाला, आणि आपले जवान मारले गेले, काश्मीरच्या सीमेवर हल्ला झाला आणि आपले जवान मारले गेले, जिवंत जाळण्यात आलं, पण त्यानंतर पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक करुन भारताने जगाला दाखवून दिलं, की भारताच्या सीमांना छेडणं महागात पडू शकतं.” यावरच अमित शाहा थांबले नाहीत, तर त्यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला, ते म्हणाले, ” मोदीजी आणि पर्रिकरजींच्या नेतृत्त्वात पहिल्यांदा भारताने आपल्या सीमांचं रक्षण, आपल्या सीमांचा सन्मान, आपल्या सार्वभौमत्त्वाचा गौरव प्रस्थापित करण्याचं काम केलं. एका नव्या युगाची सुरुवात केली, एक युग होते, जेव्हा फक्त बोलण्यातून उत्तर दिलं जायचं, पण मोदींनी ते युग आणलं, ज्यात समोरचा ज्या भाषेत प्रश्न विचारेल, त्याला त्या भाषेतच उत्तर दिलं जातं.”