पंढरपूर, दि. ११ (पीसीबी) – भाजप सरकारने दबावाचे, सुडाचे राजकारण केले असते, तर आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील निम्मे नेते त्यांच्या पक्षात दिसले नसते. आम्ही कधीही जाती-पातीचे राजकारण केले नाही, असा निशाणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर साधला.
पंढरपूर तालुक्यातील काँग्रेस नेते कल्याण काळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलताना काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीवर जोरदार हल्ला चढवला.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या चार वर्षे केंद्रात आणि राज्यात भाजपच्या काळात एफआरपीसाठी आमच्या काळात शेतकऱ्यांना आंदोलने करावी लागली नाहीत. कारखानदारांना ८ सवलती दिल्या. कमी व्याज दराचे कर्ज दिले, इथेनॉल बाबत महत्वाचा निर्णय घेतला.
मात्र, स्वत:ला ‘जाणता राजा’ म्हणून घेणाऱ्यांनी मंत्री असताना जे निर्णय घेतले नाहीत, ते आम्ही साडे चार वर्षात घेतले. पवारांची टीम आता संपली आहे. आता आमची टीम आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.