मुंबई, दि. ९ (पीसीबी) – युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचे असेल, तर शिवसेनेने तो मुद्दा रेटून धरला पाहिजे. शिवसेनेने जर असे केले नाही, तर आदित्य ठाकरे यांचा राहुल गांधी व्हायला वेळ लागणार नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आंबेडकर बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, मी मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये नाही. परंतु शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा मुद्दा सॅक्रिफाईज करु नये, एवढीच माझी विनंती. त्यांनी सॅक्रिफाईज केले, तर त्यांचा राहुल गांधी झाल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या समोर एकच मार्ग की आदित्य ठाकरे यांचा राहुल गांधी होऊ द्यायचे नसेल, तर तो मुद्दा त्यांनी रेटला पाहिजे.
दरम्यान, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती तुटल्याच्या मुद्द्यांवर बोलताना आंबेडकर म्हणाले की, असदुद्दीन ओवेसी आणि माझी बोलणी सुरु आहे. त्यामुळे इतर कोण काय बोलतंय, काय करतंय याकडे आम्ही लक्ष देत नाही. मतदारांच्या मनात अजिबात संभ्रम नाही. कारण ही युती ओवेसींनी केली आहे आणि जोपर्यंत त्यांच्याकडून येत नाही, तोपर्यंत युती कायम आहे.