ज्यांची सत्ता गेली त्यांना वाईट वाटणारच – आदित्य ठाकरे

0
409

मुंबई,दि.२७(पीसीबी) – “ज्यांची सत्ता गेली किंवा ज्यांना सत्तेपासून आम्ही दूर ठेवलं त्यांना वाईट वाटणारच” असा टोला शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे. हिरामणी तिवारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. ज्यानंतर त्यांना शिवसैनिकांनी मारहाण केली. याप्रकरणी काल चार शिवसैनिकांना अटक करण्यात आली. याबाबत आज प्रसारमाध्यमांनी आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावेळी ट्रोलर्सकडे लक्ष देऊ नका असं आवाहन आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा केलं. तसंच ज्यांची सत्ता गेली त्यांना वाईट हे वाटणारच असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

“ज्यांनी जनतेला दिलेली वचनं पाळली नाहीत ते आज सत्तेत नाहीत. ज्यांची सत्ता गेली त्यांना वाईट वाटणारच. सत्ता गेली पेक्षाही त्यांना आम्ही सत्तेपासून दूर ठेवलं. आम्ही आमच्या कामावर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यांना बर्नॉल घ्या असं मी सांगणार नाही. जे लोक ट्रोल करत आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. हातात मोबाईल आहे म्हणजे असं काहीतरी करावं लागतं.”

वरळीमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा झोपडपट्टी धारकांना पक्की घरं वाटण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी भाजपाला टोला लगावला.