चेंबूरमधील आगीत पाच जणांचा मृत्यू

0
346

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – गेल्या काही दिवसांपासूनचे मुंबईत आग लागण्याचे सत्र चालूच असून, गुरुवारी चेंबूर टिळकनगरच्या सरगम सोसायटी या १५ मजली इमारतीला आग लागली. दहाव्या आणि अकराव्या मजल्यावर लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला. यात जोशी कुटुंबातील तीन, आणि गंगर कुटुंबातील दोघांचा समावेश आहे.

बचावकार्यादरम्यान इजा झाल्याने अग्निशमन दलातील दोन जवानांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सरगम सोसायटीच्या दहाव्या मजल्यावर रात्री आठच्या सुमारास आग लागली. ही आग काही वेळातच अकराव्या मजल्यापर्यंत पोहोचली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. या दोन्ही मजल्यांवर अडकलेल्या नऊ रहिवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. मात्र या आगीत सुनीता जोशी (७२), भालचंद्र जोशी (७२), सुमन श्रीनिवास जोशी (८३), सरला गंगर (५२), लक्ष्मीबेन गंगर (८३) या पाच जणांचा मृत्यू झाला. तर छगन सिंग (२८) या अग्निशमन कर्मचाऱ्यासह श्रीनिवास जोशी (८६) यांना धुराचा त्रास झाल्यामुळे राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घरातील सिलिंडर आणि एसीच्या स्फोटामुळे ही आग अधिकच भडकली, असे ही घटना पाहणाऱ्यांचे सांगणे आहे.