मुंबई, दि. २३ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी-शाह या जोडगोळी विरोधात प्रचारसभा घेऊन पोलखोल सुरू केली आहे. लाव रे तो व्हिडीओनंतर आता नवी मुंबई मनसेच्या वतीने चि. चौकीदार व चि. सौ. का. थापाबाई यांचा गाजर विवाहसोहळा आयोजित करण्यात आला आहे.
खोटय़ा आश्वासन कृपेने २९ एप्रिल रोजी ५६ इंचाच्या मुहूर्तावर हा सोहळा होणार आहे. जॅकेटवाला फुगा, विनोदी मंत्री, पिस्तुलधारी गिऱ्या हे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतील, अशा आशयाची लग्न पत्रिका नवी मुंबईतील मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केली आहे.
युती सरकारने खोट्या घोषणा, खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली, असे राज ठाकरे आपल्या सभांतून सांगत आहेत. नवी मुंबई मनसैनिकांनी भाजप सेनेला कोपरखळी काढण्यासाठी हा गाजर विवाह सोहळा आयोजित करण्यात आला, असे गजाजन काळे यांनी सांगितले.