चांगल्या योजना बंद करून उद्धव ठाकरे सुडाचे राजकारण करत आहेत – अनिल बोंडे

0
316

मुंबई, दि.११ (पीसीबी) – उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी भाजपा सरकारच्या अनेक योजनांना ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला होता. यावरून आता भाजपा नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. चांगल्या योजना बंद करून उद्धव ठाकरे सुडाचे राजकारण करत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कामे पुसून टाकण्याचा हा अट्टहास असल्याचा आरोप बोंडे यांनी केला.

जलयुक्त शिवार योजना थांबवणे, स्थगिती देणे आणि निधी बंद करून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देणे ही चिंतेची बाब आहे. शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण भागातील जनतेच्या तोंडचे पाणी पळवण्याचे काम केले आहे. ही योजना आता रोजगार हमी योजनेत टाकण्यात आली आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांमध्ये होणारी कामे आता २५ वर्षे चालणार आहेत, असे बोंडे म्हणाले.