अहमदाबाद, दि. १ (पीसीबी) – शाळेमध्ये हजेरी किंवा उपस्थिती लावण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेझेंट सर, मॅडम किंवा येस सर, मॅडम असे म्हणावे लागत होते. मात्र, आता गुजरातमधील शाळांमध्ये उपस्थिती नोंदविण्यासाठी वर्गशिक्षकांनी नाव पुकारल्यावर लगेचच जय हिंद किंवा जय भारत म्हणावे लागणार आहे. तरच विद्यार्थ्याची उपस्थिती लावली जाणार आहे. याबाबत गुजरात सरकारने राज्यातील सर्व शाळांसाठी एक आदेश जारी केला आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना वृध्दीगंत होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे गुजरात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि प्राथमिक शिक्षण संचालनालयाने म्हटले आहे. इयत्ता १ ते १२ वीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत. गुजरातमधील अनुदानित आणि विनाअनुदानित दोन्ही प्रकारच्या शाळांसाठी हे आदेश बंधनकारक असतील.
१ जानेवारीपासून या आदेशांची अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश राज्याचे शिक्षण मंत्री भुपेंद्रसिंह चुडासमा यांनी सर्व शाळांना दिले आहेत. राजस्थानमधील एका शिक्षकांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नुकताच सत्कार केला. त्यावेळी त्यांने विद्यार्थ्यांनी जय हिंद किंवा जय भारत म्हणावे, अशी कल्पना मांडली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना वाढेल आणि जोपासली जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.