नागपूर, दि.१६ (पीसीबी) – राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूर येथे प्रारंभ झाला आहे. आज पहिल्याच दिवशी राहुल गांधींच्या सावरकरांविरोधातील विधानावरुन येथे भाजपा आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार प्रकाश गजभिये यांनी भाजपाला उत्तर दिले आहे. हातात एक फलक घेऊन त्यांनी एकट्याने वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरून भाजपाने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आक्रमक भूमिका घेतली. भाजपा आमदारांनी ‘मी पण सावरकर’ असलेल्या टोप्या घालून विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, आंदोलन करणाऱ्या भाजपाला उत्तर देण्यासाठी आमदार प्रकाश गजभिये यांनी एकट्याने आंदोलन केले. यासाठी त्यांनी हातात एक छोटा फलक घेतला होता. त्यावर “म. गांधींचा खून मी केला. मी नथुराम गोडसे बोलतोय. या देशात माझेच विचार चालतील” असा मजकूर लिहिला होता.