‘गर्व से कहो हम निजाम है’ म्हणणाऱ्यांचा औरंगाबादमध्ये विजय : नीलम गोऱ्हे

0
663

मुंबई, दि.२७ (पीसीबी)  – लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा एकमेव उमेदवार औरंगाबाद मतदार संघातून विजयी झाला आहे. शिवसेनच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी यावर प्रतिक्रिया देतांना वंचित बहुजन आघाडीचा समाचार घेतला आहे. औरंगाबादचा निकाल म्हणजे ‘हम निजाम है’ म्हणणाऱ्यांचा विजय आहे. वंचित आघाडीचा सर्वाधिक फायदा फक्त एमआयएमला झाला असल्याचे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीबाबत त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला एकही जागेवर विजय मिळवता आला नाही. प्रकाश आंबेडकर यांचा सुद्धा पराभव झाला. एमआयएमचे इम्तियाज जलिल यांना वंचित आघाडीचे सांगण्यात येत असले तरी ते एमआयएम पक्षाकडून उमेदवार होते. त्यामुळे, त्यांना वंचित बहुजन आघाडीचे खासदार म्हणता येणार नाही. औरंगाबादमध्ये ‘गर्व से कहो हम निजाम है’ म्हणणाऱ्यांचा विजय झाला आहे. मराठवाड्यात रजाकारांच्या विरोधात मुक्तिसंग्रामात अनेक पिढ्या उतरल्या होत्या, या पिढ्यांना लोकशाहीच्या मार्गाने नेस्तनाभूत करण्याचा काम औरंगाबादच्या जनतेकडून घडवून आणले गेले आहे. अशी खोचक टीका नीलम गोऱ्हे यांनी केली.