खा. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काढणार ‘शिवस्वराज्य यात्रा’

0
704

मुंबई, दि, ३१ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आधीच राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठी गळती लागली आहे. अनेक नेत्यांनी विकासाचा मुद्दा पुढे करत सत्ताधारी भाजपकडे पळ काढला आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आले आहे. अशा नाजूक परिस्थित पक्षाला सावरण्यासाठी शिरूरचे खा. डॉ. अमोल कोल्हे ‘शिवस्वराज्य यात्रा’ काढणार आहे.

शिवस्वाराज्य यात्रेला ६ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. यात्रेचे नेतृत्व खासदार अमोल कोल्हे करणार आहेत. तसेच अमोल कोल्हे यांच्यावर राष्ट्रवादी पक्षाची मोठी जबाबदारी आहे, असे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार काही दिवसांपूर्वीच म्हणाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला पुन्हा बळ आणण्यासाठी अमोल कोल्हे प्रयत्न करणार आहेत. तसेच सामान्य नागरिकांमध्ये खासकरून तरुणांमध्ये अमोल कोल्हे चांगलेच प्रसिद्ध आहेत. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या या यात्रेचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला फायदा होणार आहे.

राज्यात आता काही दिवसातचे विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने देखील जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेशी संवाद साधण्यासाठी ‘महाजनादेश यात्रे’वर जाणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या यात्रेला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शिवस्वराज्य यात्रा काढणार असल्याचे दिसत आहे.