‘कोरोना निर्मिती नैसर्गिक नाहीच…’

0
325

वॉशिंग्टन, दि. २४ (पीसीबी) : कोरोना व्हायरस हा नैसर्गिकरित्या निर्माण झालेला नाही. चीनमध्ये नेमकं काय घडलं? कोरोनाची उत्पत्ती नेमकी कशी झाली? याची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी अमेरिकेचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथोनी फाऊची यांनी केली आहे.

डॉ. अँथोनी फाऊची यांनी एका मुलाखतीत ही मागणी केली आहे. कोरोना व्हायरस नैसर्गिकरित्या निर्माण झाला यावर माझा विश्वास नाही. हा व्हायरस नैसर्गिकरित्या निर्माण झाला यावर मी बिलकूल सहमत नाही. चीनमध्ये काय घडलं होतं, याची चौकशी सुरूच ठेवली पाहिजे. जोपर्यंत सर्व माहिती मिळत नाही, तोपर्यंत ही चौकशी सुरूच ठेवली पाहिजे, असं फाऊची म्हणाले.

प्राण्यातून संसर्ग फैलावला?
हा व्हायरस प्राण्यांपासून निर्माण झालेला असावा, असं या प्रकरणाचा तपास करणाऱ्यांचं म्हणणं आहे. एखाद्या प्राण्यामुळे एखाद्या व्यक्तीला हा संसर्ग झाला असेल. त्यानंतर हा संसर्ग फैलावला असेल, असं फाऊची यांनी म्हटल्याचं फॉक्स न्यूजने म्हटलं आहे. या व्यतिरिक्त आणखी काही घडण्याची शक्यता आहे. त्याचा शोध घेण्याची गरज आहे. त्यामुळे कोरोनाच्या उत्पत्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं सांगतानाच चीनने जे काही केलं. त्याचा पुरावा नाहीये. मात्र या प्रकरणाच्या पुढील चौकशीला माझा पाठिंबा आहे, असं ते म्हणाले.

एका दिवसात 4400 हून अधिक मृत्यू
दरम्यान, भारतात एका दिवसात एका दिवसात 4400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात घट झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 18 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 2 लाख 22 हजार 315 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मोठ्या कालावधीनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या सव्वादोन लाखांच्या खाली आली आहे. कालच्या दिवसात 4 हजार 454 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण घटले असले, तरी कोरोनाबळींच्या संख्येत वाढ झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.

आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 67 लाख 52 हजार 447 वर गेला आहे. देशात 2 कोटी 37 लाख 28 हजार 11 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 3 हजार 720 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 27 लाख 20 हजार 716 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 19 कोटी 60 लाख 51 हजार 962 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.