किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावर जाणार: पोलिसांकडून मात्र अमरावती दौरा रद्द करण्याची विनंती

0
178

मुंबई, दि.१६ (पीसीबी) : त्रिपुरातील कथित घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाजाने काढलेल्या मोर्चात मोठा हिंसाचार पाहायला मिळाला. त्यानंतर भाजपकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली. या हाकेला प्रतिसाद देत हिंदू संघटनांनी काढलेल्या मोर्चातही दगडफेक, तोडफोडीसारख्या घटना घडल्या. त्यामुळे अमरावतीमध्ये गेल्या तीन चार दिवसांपासून दहशतीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, पोलिसांकडून सोमय्या यांनी अमरावती दौरा रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे.

पोलिसांनी सोमय्या यांना अमरावती दौरा रद्द करण्याची विनंती केली असली तरी सोमय्या मात्र अमरावती दौऱ्यावर ठाम आहेत. रझा अकादमीच्या मोर्चानंतर ज्या दुकानाची तोडफोड झाली, व्यापारांना मारहाण करण्यात आली, त्यांच्या भेटीसाठी आपण अमरावती दौऱ्यावर येत असल्याचं पत्र सोमय्या यांनी अमरावती पोलिसांना पाठवलं आहे. मात्र, अमरवाती पोलीस आयुक्तांनी अमरावती शहर आणि जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने दौरा स्थगित करावा असं पत्र पाठवलं आहे. मात्र, सोमय्या दौऱ्यावर ठाम आहेत. आपण अमरावती दौऱ्यावर जाणार असून पीडितांची भेट घेणारच असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

अमरावती हिंसाचार प्रकरणात माजी कृषीमंत्री आणि भाजप नेते अनिल बोंडे यांच्यासह भाजपच्या 14 नेत्यांना काल अटक करण्यात आली होती. त्यानंतर संध्याकाळी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. अटकेवेळी माध्यमांशी बोलताना अनिल बोंडे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती. महाराष्ट्रात आणीबाणी सुरु झाली आहे. ज्यांनी दंगल केली त्यांना राज्य सरकार अटक करत नाही. मात्र, कितीही अवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी हिंदू मार खाणार नाही, अशी प्रतिक्रिया देतानाच, ज्यांच्या घरात तलवारी आहेत त्यांच्या घरी झाडाझडती घ्या, अशी मागणीही अनिल बोंडे यांनी केली आहे. दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक केली नाही तरी पोलिसांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यात आल्याचा आरोप बोंडे यांनी केला होता. त्यावरुन पोलिस आणि बोंडे यांच्यात शाब्दिक चकमकही पाहायला मिळाली होती.

त्रिपुरामध्ये मशिदीवर हल्ला झाल्याचे कथीत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्रिपुरासह महाराष्ट्रात देखील यांचे पडसाद उमटल्याचे पहायला मिळाले. अमरावतीमध्ये दंगल उसळली होती. जमावाकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेत काही पोलीस देखील जखमी झाले. दोन दिवस शहरात तणावपूर्ण वातावरण होते. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आली असून, शहरात शांतता असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली होती. या प्रकरणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाईची दिशा ठरवू, जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं होतं.