किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी; परस्पर विरोधात गुन्हे दाखल

0
385

निगडी, दि. ३१ (पीसीबी) – किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. त्यावरून दोन्ही गटांनी परस्पर विरोधात गुन्हेही दाखल केले. हा प्रकार मिलिंदनगर, ओटास्कीम येथे सोमवारी दुपारी घडला.

भीमा दत्ता कांबळे (वय २७, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमर सुरेश हिरनाईक (वय २२), सविता सुरेश हिरनाईक (वय ४०) देवकी सुरेश हिरनाईक (वय १९), अजय चौधरी, रोहित सोनवणे, राहुल, कुणाल, निलबा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास फिर्यादी कांबळे यांचे कामगार रंग खेळत होते. त्यावरून आरोपी अमर याने फिर्यादी यांचा कामगार विकास गजभिव यांना लोखंडी चॉपर सारख्या हत्याराने पाठीवर वार करून जखमी केले. त्यानंतर आरोपी सविता आणि देवकी यांनी कामगार सागर गजभिव व अमोल पंचमुख त्यांना दगडाने मारून शिवीगाळ केली. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी कांबळे आणि त्यांचा भाऊ गेले असता आरोपींनी त्यांनाही चॉपरने वार करून दगडाने मारून जखमी केले.

याच्या परस्पर विरोधात सविता सुरेश हिरनाईक यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार राकेश कांबळे (वय २१), भीमा कांबळे (वय ३५), सागर गजभिव (वय २७), सुनील कांबळे (वय ४०), अनिल कांबळे (वय ४२) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिरनाईक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी दुपारी आरोपी दारू पीत बसले होते. त्याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी फिर्यादी, त्यांचे पती, मुलगा आणि मुलीला दगडाने मारून दुखापत केली. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास निगडी पोलीस करीत आहेत.