मुंबई, दि. २ (पीसीबी) – मुसळधार पावसामुळे मालाडच्या पूर्व परिसरातील पिंपरीपाडातील झोपडपट्टीवर भिंत कोसळून १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिकडे पुण्यात पुन्हा एकदा आंबेगांवमध्ये भिंत पडून ६ मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या सर्व दुर्घटनेवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ट्विट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय चाललंय राज्यात? असा सवाल केला आहे.
अजित पवार यांनी टविट करत म्हटले आहे की, गरीबाच्या जीवाला काही मोल आहे की नाही? अशा दुर्घटनांमधले दोषी कुठल्याही स्थितीत सुटता कामा नयेत. मुंबई महापालिका दरवर्षी मुंबई स्वच्छ झाल्याचा दावा करते. सरकारने खबरदारी न घेतल्याने किड्या-मुंग्यांप्रमाणे माणसं मरतात. जे आहे ते सांभाळता येत नसलेले स्मार्ट सिटी करायला निघालेत! महापौरांना तुंबलेली मुंबई दिसत नाही. हा सत्तेचा माज आहे. सरकारचा बेजबाबदारपणा आहे, असा आरोपही पवार यांनी केला.
बांधकाम नियमांकडे दुर्लक्ष हे पुण्यात विशेषतः कोंढव्यात अशा दुर्घटना घडण्यामागे मुख्य कारण आहे. यामध्ये महापालिका,राज्य सरकारची सुद्धा चूक आहे. जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणीही पवार यांनी ट्विटमध्ये केली आहे.