औद्योगिक क्षेत्रात राज्याची वाटचाल प्रगतीपथावर – मुख्यमंत्री   

0
854

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य  असून  जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक राज्यात आणण्यासाठी सरकारने  प्रयत्न  केले आहेत. त्यामुळेच  संघटीत क्षेत्रात सर्वाधिक रोजगार  महाराष्ट्रात निर्माण झाले आहेत. औद्योगिक क्षेत्रात राज्याची वाटचाल प्रगतीपथावर  सुरू आहे. त्याचबरोबर  समाजात सोहार्दपूर्ण वातावरण कायम राहण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) येथे व्यक्त केले.

७२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, एससी-एसटी, ओबीसी समाजासाठी सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात राज्याने लक्षणीय प्रगती केली आहे. महाराष्ट्र सातत्याने पुढे जावा. त्यासाठी महाराष्ट्राचे पुरोगामित्व कायम राहणे आवश्यक आहे. शाहु-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र सातत्याने पुढे गेला पाहिजे. सर्वांना एकत्रित घेऊन बलशाली महाराष्ट्र करू, असे म्हणत आजपर्यंत महाराष्ट्र एकसंध राहिला तो पुढेही ठेऊ, असे फडणवीस म्हणाले.

१९९८ ते २०१४ या १५ वर्षांच्या कालावधीत फक्त ४५० कोटी रूपयांची अन्नधान्याची खरेदी केली होती. मात्र ,मागील ३ वर्षांत राज्य सरकारने ८ हजार कोटींची खरेदी केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रती राज्य सरकार प्रतिबद्ध असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे, त्यांना चांगली बाजारपेठ मिळावी म्हणून राज्य सरकार सातत्याने प्रयत्न  करत आहे. जागतिक बँकेबरोबरही प्रकल्प सुरू केले आहेत. विदर्भ, मराठवाडामध्ये विकास कामांकडे लक्ष देण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.