ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास तीव्र विरोध करू; ओबीसी संघटनांचा इशारा

0
609

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – राज्य सरकारने आज (गुरूवार) विधीमंडळात मराठा आरक्षणासंबंधीचा कृती अहवाल सादर केला. या अहवालात  मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाची तरतूद केली आहे. परंतु मराठा समाजाला हे आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागण्याची शक्यता  आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास आम्ही तीव्र विरोध करु, असा इशारा ओबीसी संघटनांनी दिला आहे.

मागास आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार मराठा समाज हा मागासलेपणाचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक हे तीनही निकष पूर्ण करतो. त्यामुळेच मागास आयोगाने अहवालामध्ये मराठा समाज हा मागास असल्याचा निष्कर्ष नोंदवला आहे. त्यामुळेच विधेयकात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.

यावर प्रतिक्रिया देताना ओबीसी नेत्यांनी भाजपवर विश्वास नसल्याचे मत व्यक्त केले आहे.  मराठा समाजाला अरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये. तसेच आरक्षणाचे संपूर्ण विधेयक समोर आल्याशिवाय सरकारवर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे ओबीसी बांधवांची फसवणूक करु नका, असा इशारा ओबीसी संघटनांनी भाजपला दिला आहे. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का  लागणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.