इंदोर, दि. ३ (पीसीबी) – भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या एअर स्ट्राइकच्या कारवाईवर कोणतीही शंका नाही. मात्र, हे तंत्रज्ञानाचे युग आहे, उपग्रहाद्वारे छायाचित्रे शक्य आहेत. लादेनचा खात्मा केल्यानंतर अमेरिकेने जगासमोर भक्कम पुरावे सादर केले होते, त्याप्रमाणे भारतानेही करायले हवे, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले आहे.
इंदोरमध्ये सिंह बोलत होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका केल्याबदद्ल कौतुक केले. इम्रान खान यांनी चांगले शेजारी असण्याचा नवा मार्ग दाखवला आणि आमचा शूर अधिकारी आम्हाला परत केला. आता त्यांनी हाफिज सईद आणि मसूद अजहर यांना भारताच्या ताब्यात द्यावे, असेही सिंह म्हणाले.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतरही हवाई दलाला पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करायचा होता, मात्र, त्यावेळी मनमोहन सिंग सरकारने परवानगी दिली नाही, हा पंतप्रदान मोदींचा दावाही सिंह यांनी खोडून काढला. याविषयी मी पंतप्रधान मोदीं इतका खोटारडा व्यक्ती पाहिला नाही, इतकेच म्हणू शकतो, असे सिंह म्हणाले.