उध्दव ठाकरेंना बोलण्याचे भान नाही, जनताच त्यांना फळ देईल – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

0
974

नागपूर, दि. २६ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना बोलण्याचे काहीही भान नाही. आगामी निवडणुकीत त्यांना जनताच फळ देईल, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुखपत्र ‘तरूण भारत’च्या  आजच्या (बुधवार) अग्रलेखातून केली आहे.  

या अग्रलेखात म्हटले आहे की,  उद्धव ठाकरे यांना  काय बोलावे, काय बोलू नये, आपण काय करत आहोत, काय करायला पाहिजे, याचे भान राहिलेले दिसत नाही. उद्धव ठाकरे सरकारला चोर म्हणतात, याचा अर्थ ते स्वत:च्या मंत्र्यांनाही आणि पक्षालाही चोर म्हणत आहेत. त्यांना असे वाटत आहे की, आपण काय करतोय हे जनतेला कळत नाही. परंतु आगामी निवडणुकांमध्ये जनता त्यांना धुळीत मिळवल्याशिवाय राहणार नाही.

‘पहारेकरी चोर आहे’, असे बोलून उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांची री ओढत पंतप्रधानपदाचा अवमान केला आहेच, पण आपण राजकारणात किती अपरिपक्व आहोत, याचे त्यांनी दर्शन घडवले आहे. सरकारमध्ये राहण्याचा मोह शिवसेना आवरु शकला नाही, सत्ता सोडण्याची शिवसेनेत हिम्मतही नाही, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

या अग्रलेखामध्ये शिवसेनेच्या नेत्यांचाही संघाने खरपूस समाचार घेतला आहे.  पर्यावरण मंत्री रामदास कदम माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर बोचऱ्या शब्दात  वाभाडे काढले आहेत. १८-१८ तास काम करणाऱ्या पंतप्रधानांना जर ठाकरे कुंभकर्ण म्हणत असतील, तर ते आंधळे आहेत. सर्व काही दिसत असूनही दिसत नसल्यासारखे बोलत असतील, तर त्यांना ढोंगी म्हणावे लागेल, अशी टीका केली आहे.