नाशिक, दि. २५ (पीसीबी) – देशाची अर्थव्यवस्था सुधाऱण्यासाठी मला फक्त ६० दिवसांची मुदत द्या, आश्वासने पूर्ण नाही केली, तर फटके मारा, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. आता त्यांनी काही आश्वासने पूर्ण केलेली नाहीत, त्यामुळे त्यांना कोणत्या चौकात बोलवायचे?, असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
निफाडमध्ये काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारासाठी सभा झाली. या सभेत पवारांनी मोदीवर हल्ला चढवला. लोकांनी मोदींना संधी दिली पण त्यांनी भ्रमनिरास केला, अशी टीका पवार यांनी केली.
पवार म्हणाले की, धनराज महाले यांना मतदान करा. घड्याळाचे बटण दाबा कारण आम्हाला या देशाच्या संसदेत शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, छोटे व्यावसायिक यांच्या हिताची जपणूक करणारी एक लॉबी तयारी करायची आहे. दरम्यान, पिंपळगाव येथे पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी कांदा मार्केट बंद ठेवण्याचा आदेश सरकारने काढला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे या दिवशी झालेले नुकसान कोण भरून देणार, असा सवाल पवार यांनी भाजप सरकारला यावेळी केला.