मुंबई, दि. १ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना चांगलाच महागात पडण्याची शक्यता आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी विखे-पाटील यांच्याविरोधात मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्यामुळे विखे पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे.
मुंबईच्या विकास आराखड्यात मुख्यमंत्र्यांनी १ लाख कोटींचा घोटाळा केला आहे, असा आरोप विखे पाटलांनी केला होता. या आरोपानंतर राज्यात खळबळ उडाली होती. या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांनी आपले मौन सोडले आहे. आरोप सिद्ध करा अन्यथा माफी मागा, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी विखे-पाटील यांना दिला आहे.
त्याचबरोबर आरोप सिद्ध नाही केले, तर मानहानीचा दावा दाखल केला जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी विखे पाटील यांना दिला आहे. त्यामुळे विखे पाटील आता कोणती भूमिका घेतात. याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.