“आयसीयू बेड हे आयसीयूच्या रुग्णांनाच मिळाले पाहिजेत”

0
175

मुंबई,दि.०२(पीसीबी) – अनेकदा रुग्ण स्वत:च आयसीयूत दाखल होण्याचा निर्णय घेतात. दबाव आणून आयसीयू बेड अडवले जात आहेत. छोट्या शहरांमध्येही हे सुरु असून ते चुकीचं आहे. आयसीयू बेड हे आयसीयूच्या रुग्णांनाच मिळाले पाहिजेत असं मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“अनेकदा रुग्ण स्वत:च आयसीयूत दाखल होण्याचा निर्णय घेतात. दबाव आणून आयसीयू बेड अडवले जात आहेत. छोट्या शहरांमध्येही हे सुरु असून ते चुकीचं आहे. आयसीयू बेड हे आयसीयूच्या रुग्णांनाच मिळाले पाहिजेत. कोणतीही लक्षणं नसणाऱ्यांना ते दिले नाही पाहिजेत. पण दुर्देवाने काही श्रीमंत लोक जे खर्च उचलू शकतात ते आयसीयू बेड अडवतात. त्यामुळे अनेकदा आयसीयू बेड्सची कमतरता जाणवते. याबद्दल जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना जागरुक राहावं लागेल. लक्षणं नसणाऱ्या रुग्णांना आयसीयू बेड देण्यावर प्रतिबंध आणावे लागतील,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, १०० टक्के ट्रेसिंगवर भर दिला जात आहे. नियंत्रण आणण्यासाठी ट्रेसिंग करणं रामबाण उपाय आहे. करोना रुग्णाच्या संपर्कातील २० जणांना ट्रेसिंग कऱणं आम्ही बंधनकारक केलं आहे. जे कमी करत आहेत त्यांना सतत सूचना देत आहोत. ट्रेसिंग वाढलं की टेस्टिंग वाढतं. त्यात जे पॉझिटिव्ह आढळतात त्यांना क्वारंटाइन केलं जातं, उपचार दिले जातात” असं त्यांनी चाचण्यांचं प्रमाण कमी झाल्याच्या विरोधकांच्या आरोपांवर बोलताना सांगितलं.