कोल्हापूर, दि. २४ (पीसीबी) – भाजपमधील इनकमिंगवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी निशाणा साधला आहे. आम्ही ज्यांना नाकारले, त्यांना ते मांडीवर घेऊन बसत आहेत. ज्यावेळी स्वतःला मूल होत नाही, त्यावेळी मुल दत्तक घेतले जाते. पाच वर्षे सत्तेत राहूनही भाजपचा पाळणा हालत नाही, त्यामुळे त्यांना बाहेरचे लोक घेऊन त्यांना उमेदवारी देण्याची वेळ आली आहे, अशी टीका पाटील यांनी केली.
कोल्हापुरात पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, भाजपचे जवळपास ३० ते ३५ टक्के उमेदवार हे काँग्रेस, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले आहेत. गेल्या पाच वर्षात सत्तेवर असताना यांना पक्ष वाढवता आलेला नाही. आयाराम आणि गयाराम यांच्यासाठीच यांनी वेळ खर्ची घातला, असे ते म्हणाले.
भाजपच्या उमेदवारांच्या यादीत मूळ भाजपचा कार्यकर्ता कोठेच दिसत नाही. यादीवर नजर टाकली, तर सगळे बाहेरचच उमेदवार असल्याचे दिसून येईल. जनाधार नसलेल्यांना आम्ही नाकारतो, त्यांना ते पक्षात घेऊन उमेदवारी देत आहेत. काय होणार आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. जनता यांचा पराभव केल्याशिवाय रहाणार नाही, असे पाटील म्हणाले.