आता शिवसैनिकाला प्रभू रामाचे नाव घेण्यासाठी १० जनपथवर नाक रगडावे लागेल- गिरिराज सिंह

0
313

मुंबई, दि.२९ (पीसीबी)- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आले. तत्पूर्वी साधारण महिनाभर भाजपा विरुद्ध शिवसेना व आघाडीत सत्तासंघर्ष सुरू होता. एवढेच नाहीतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या समर्थनाने भाजपाने सरकार स्थापन केल्यानंतर हा संघर्ष सर्वोच्च न्यायलायात देखील पोहचला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अजित पवारांनी

उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत केलेल्या घरवापसीमुळे देवेंद्र फडणवीस यांना देखील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर गुरूवारी महाविकास आघाडीच्यावतीने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रपदाची शपथ घेतली. भाजपाची साथ सोडत व एनडीएमधून बाहेर पडत काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊन सरकार स्थापन केलेल्या शिवसेनेवर केंद्रीय मंत्री भाजापाचे नेते गिरराज सिंह यांनी घणाघात केला आहे. आता शिवसैनिकाला प्रभू रामाचे नाव घेण्यासाठी सोनिया गांधी यांचे निवास्थान असलेल्या १० जनपथवर नाक रगडावे लागेल, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

”शिवसेनेने बाळासाहेबांच्या आत्म्यास सोनिया गांधी यांच्याकडे गहाण ठेवले आहे. आता शिवसैनिकाला प्रभू राम आणि अयोध्येचे नाव घेण्यासाठी देखील १० जनपथवर नाक रगडावे लागेल.शिवसेनेला पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, कशाप्रकारे मुघलांना भारतात आपले पाय पसरले असतील?” असे गिरिराज सिंह यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.