“…आणि म्हणून दिवाळी अखेर आपण ‘तुळशीविवाह’च करतो. त्यामागील ‘हि’ गोष्ट नक्की जाणून घ्या….

0
197

भारतीय संस्कृती आणि परंपरे प्रमाणे दिवाळी अखेर आपण तुळशीविवाह करतो. पण यामागे नक्की काय शास्त्र आहे? आपण ‘तुळशीविवाह’च का करतो, या मागे पुराणामध्ये काही अध्यात्मिक शास्त्र आणि कथा आहेत. त्या आपण आज जाणून घेऊयात.

प्राचीन काळात जालंधर नावाचा राक्षस चारीकडे खूप उत्पात आणि छळ करत होता. जालंधर राक्षस वीर, शक्तिशाली आणि पराक्रमी होता. त्याच्या या साहस असल्यामागे कारण होते त्याच्या पत्नी ‘वृंदा’ यांचे पतिव्रता धर्म. त्यांच्या या प्रभावामुळे तो सर्वव्यापी होता. परंतु आपल्या शक्तींचा तो गैरवापर करू लागला. त्यामुळे जालंधराच्या या उपद्रवामुळे त्रस्त होऊन सर्व देवगण प्रभू विष्णूंकडे आले आणि संरक्षणासाठी त्यांच्याकडे याचना केली. तेव्हा त्यांची प्रार्थना ऐकून प्रभू विष्णूंनी जालंधर पत्नी वृंदा यांचे पतिव्रता धर्म भंग करण्याचा निश्चय केला. इकडे वृंदाचे सतीत्व नष्ट झाल्यामुळे देवतांशी युद्ध करत असताना जालंधरचा मृत्यू झाला. वृंदाला ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी क्रोधित होऊन प्रभू विष्णूंना शाप दिला की, ‘ज्या प्रकारे छळ करून तुम्ही मला पती वियोग दिला आहे, त्याचप्रमाणे तुमच्याही पत्नीचा छळपूर्वक हरण होऊन स्त्री वियोग सहन करण्यासाठी तुम्हाला मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागेल.’ आणि असे म्हणत वृंदा या पती जालंधरसोबत सती गेल्या. ज्या जागी त्या सती गेल्या त्या जागी तुळशीचे झाडं उत्पन्न झाले.

पुराणातील दुसऱ्या कथेप्रमाणे वृंदाने रागात विष्णूंना शाप दिला की, ‘माझे सतीत्व भंग केल्यामुळे तुम्ही दगड व्हाल.’ आणि त्याच दगडाला ‘शालिग्राम’ म्हणतात. तेव्हा विष्णू म्हणाले की, ‘हे वृंदा तुझ्या सतीत्वाचे फळ म्हणून तू तुळस बनून माझ्यासोबत राहशील. माझ्यासोबत तुझा विवाह लावणाऱ्यांना पुण्य लाभेल.’

आणि तेव्हापासून तुळसविना शालिग्राम किंवा विष्णूंची पूजा अपुरी मानली जाते. शालिग्राम आणि तुळशीचा विवाह प्रभू विष्णू आणि महालक्ष्मीच्या विवाहाचे प्रतिकात्मक विवाह आहे.