अर्थसंकल्पातून सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री फडणवीस

0
660

मुंबई, दि. १ (पीसीबी) – केंद्र सरकारने  सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांचे  जीवनमान उंचावण्याचा  प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तसेच शेतकरी-कष्टकरी, मध्यमवर्गीय नोकरदार, महिला आणि ग्रामीण जनतेच्या विकासाशी असलेली सरकारची बांधीलकीच यातून दिसून  येत आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर दिली आहे.

असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ३ हजार रुपये पेन्शन, शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६ हजार रुपयांचे अर्थसहाय्य, या निर्णयामुळे सर्वसामान्य घटकांची उन्नती होण्यासाठी मदत होणार आहे.  नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागणाऱ्या शेतकऱ्यांना २ टक्के व्याजाची सवलत, तर वेळेत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त ३ टक्क्यांचा लाभ देण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मनरेगासाठी अधिकची तरतूद केल्याने ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होण्यास  हातभार लागणार आहे. राष्ट्रीय कामधेनू आयोगाच्या स्थापनेमुळे दुधाचे उत्पादन वाढण्यासोबतच शेतकऱ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. १ लाख गावे डिजिटल करण्याचा उपक्रम हा ग्रामविकासाला नवा आयाम देणारा ठरेल. आयकर उत्पन्नाची मर्यादा ५ लाखापर्यंत वाढविल्यामुळे नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.