पुणे, दि. ४ (पीसीबी) – भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात केलेल्या हल्ल्याची अधिकृत माहिती दिलेली नाही, तरीही भाजप अध्यक्ष अमित शहा अडीचशे- तीनशे दहशतवादी मारल्याचे सांगून अकलेचे तारे तोडत आहेत, अशी टीका काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
बालकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकला सर्व विरोधकांनी सरकारला पाठिंबा दिला आहे. तर पंतप्रधान मोदी भाजपचा प्रचार करत होते. आंतरराष्ट्रीय माध्यमांत एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित होत आहेत, असे चव्हाण म्हणाले.
भारताकडे राफेल असते, तर पाकिस्तानसोबत झालेल्या हवाई कारवाईचे चित्र वेगळे दिसले असते, असे पंतप्रधान मोदीच म्हणत आहेत. पंतप्रधानांनी हे विधान नजरचुकीने केलेले नाही. तर राजकीय हेतूने केले आहे. हे भारतीय सैन्याचे मनोबल कमी करणारे विधान आहे. त्यामुळे त्यांनी भारतीय सैन्याची माफी मागावी, असेही चव्हाण म्हणाले.