अजित पवारांचे मन वळवण्यात चार तासांच्या चर्चेनंतरही राष्ट्रवादीच्या नेत्यांना अपयश

0
657

मुंबई,दि.२५(पीसीबी) – बंडखोरी करुन भाजपासोबत सत्ता स्थापन केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरु आहेत. दरम्यान, अजित पवारांसोबत तब्बल ४ तास बैठक घेऊन चर्चा केल्यानंतरही त्यांचे मन वळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना अपयश आले आहे. त्यामुळे त्यांच्याशी पुन्हा चर्चा करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

विधानभवनात रामराजे निंबाळकर यांच्या चेंबरमध्ये ही बैठक सुरु होती. चार तासांच्या चर्चेनंतर निंबाळकर, पवार, वळसे-पाटील, भुजबळ हे चारही नेते दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास बाहेर पडले. मात्र, बाहेर पडल्यानंतर या नेत्यांनी माध्यमांशी तुरळक संवाद साधला. यातून ते अजित पवारांचे मन वळवण्यात अपयशी ठरल्याचे जाणवत होते. दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये बोलणं झालं नसल्याचं यावेळी छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. तसेच पुन्हा त्यांची भेट घेऊन त्यांना समजावणार असल्याचे वळसे-पाटील म्हणाले.

दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे, रोहित पवार यांनी आपल्या व्हॉट्सअॅप, ट्विटर आणि फेसबुक पोस्टद्वारे अजित पवारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्नही केला होता. त्यानंतर वळसे-पाटील यांनी सुरुवाताला अजित पवारांच्या निवासस्थानी भेट देऊन समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शपथविधीसाठी विधानभवनात गेलेल्या अजित पवारांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, यामध्येही राष्ट्रवादीचे नेते अपयशी ठरले.