अखेर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला NCB ने केली अटक; आर्यनकडून मोठ्या गोष्टींचा खुलासा

0
233

मुंबई, दि.०३ (पीसीबी) : अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसबी) शनिवारी संध्याकाळी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर छापेमारी केली. याप्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर एनसीबीने आर्यनची कसून चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली आहे. त्याच्यासोबत इतर दोघांना एनसीबीने अटक केल्याचे समोर येत आहे.

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या या क्रूझवर शनिवारी रात्री उशिरा एनसीबीने छापेमारी केली. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यावेळी एकूण आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची मुंबईतील एनसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर अनेकांनी ते सर्वजण पार्टीचा भाग असल्याची कबुली दिली आहे. तर काही जणांकडे ड्रग्स सापडल्याचेही बोललं जात आहे. यामुळे एनसीबीने आता आर्यन खानसह दोघांना अटक केली आहे. आर्यनला अटक केल्यानंतर त्याला वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आलं आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकत एनसीबीने आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात ड्रग्जदेखील जप्त करण्यात आलं आहे. दरम्यान यावेळी क्रूझवर बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानदेखील उपस्थित होता. आर्यनसोबत इतर सात जणांनाही एनसीबीने ताब्यात घेतले होते. यावेळी एनसीबीने आर्यन खानची कसून चौकशी केली. त्याच्यासोबतच अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा, नूपुर सारिका, इसमीत सिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा या सर्वांचीही एनसीबी चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर आर्यन खानसह दोघांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खान, अरबाज मर्चेंट आणि मुनमुन धामेचा या तिघांना एनसीबीने अटक केली आहे. तर इतर पाच जणांची अद्याप चौकशी सुरु आहे. ही क्रूझ मुंबईहून गोव्याकडे जात होती. माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्यांपैकी दोघे हरियाणा आणि दिल्लीतील ड्रग तस्कर आहेत. प्रत्येक व्यक्तीने या पार्टीत प्रवेशासाठी ८० हजारांपेक्षा जास्त फी भरली होती.

सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, आर्यन खानला क्रूझवरील पार्टीमध्ये पाहुणा म्हणून बोलावण्यात आलं होतं. पार्टीत जाण्यासाठी त्याला कोणतेही पैसे भरावे लागले नव्हते. चौकशीदरम्यान आर्यन खानने कार्यक्रमाच्या आयोजकांना आपल्या नावाचा वापर करत इतरांना आमंत्रण दिलं असा दावा केला आहे.