नागपूर, दि. ५ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेस उमेदवार आशिष देशमुख यांनी घेतलेले सर्व आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी यांनी फेटाळून लावले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिज्ञापत्रावर २०१८ मधील जुना नोटरी स्टॅम्प लावला आहे, असा आक्षेप घेत त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध घोषित करण्यात यावा, अशी मागणी देशमुख यांनी केली होती. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी छाननी अंती ही मागणी फेटाळून लावली आहे.
२६ डिसेंबर २०१८ मधील जूना नोटरी स्टॅम्पची मुदत संपली असताना मुख्यमंत्र्यांनी प्रतिज्ञा पत्रावर जुनाच स्टॅम्प वापरला आहे. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध करावा, अशी मागणी आशिष देशमुख आणि अपक्ष उमेदवार प्रशांत पवार यांनी केली होती. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी हा आक्षेप फेटाळून लावत मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला आहे.