मुंबई, दि. १ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
या सर्व प्रकरणावर भाष्य करताना एकनाथ खडसे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांसाठी आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे. आम्ही त्यांना स्वच्छ करुन घेतो. पक्षात आलेल्यांना क्लीन चिट दिली जाते, त्यानंतर ते आपल्या कामाला लागतात. मात्र भाजपमध्ये येणारे साधुसंत नाहीत. सत्तेची ऊब मिळावी यासाठी हे सगळे येत आहेत. भाजपची नीती मूल्य मान्य म्हणून सर्व येत आहेत असे नाही. पक्ष वाढवण्यासाठी चांगल्या लोकांना पक्षात घ्याव लागत. मात्र चांगल्या लोकांची व्याख्या ठरवत असताना, दुमत होऊ शकते.
तसेच पुढे बोलताना खडसे यांनी ‘नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार, असे अनेक वर्षांपासून ऐकतोय. प्रत्येक पक्षाने कोणाला पक्षात घ्याव, हा अधिकार त्या पक्षाला आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या पक्षप्रवेशावरून शिवसेनाचा दबाव घेऊ नये’ असा सल्लाही त्यांनी दिला आहे. तसेच या निवडणुकीत शिवसेनेसोबतच्या युतीचा फायदा होईल असेही विधान केले आहे.