उस्मानाबाद, दि. २७ (पीसीबी) – राजकारण आहे, बदल होत असतात, चांगले वाईट दिवस सुरुच असतात म्हणून काही त्यासाठी पक्ष बदलायची गरजे नसते. याला सरळ पळपूटेपणा म्हणतात. ज्या पक्षाने आपल्याला वाढवले, नेतृत्त्व करण्याची संधी दिली. तो पक्ष सोडून दुसऱ्या अनोखी पक्षाकडे जाणे म्हणजे जागलेल्या अन्नाला लाथ मारणे असेच म्हणावे लागेल. असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना लगावला.
पद्मसिंह पाटील आणि आमदार राणा यांनी शिवस्वराज्य यात्रेकडे पाठ फिरवली. शिवाय त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा देखील जोरदार सुरू आहे. तोच धागा पकडून जयंत पाटील यांनी हा टोला लगावला.
पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातबारा उताऱ्यावर ज्यांचे नाव लिहिलेले आहे. ते जर पक्ष बदलण्याचा विचार करत असतील तर मला खात्री आहे, की उस्मानाबाद जिल्ह्यातील मावळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत राहतील असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.