पिंपरी चिंचवड शहरातील विविध सामाजिक सांघटना व राजकीय पक्षांच्या वतीने आकुर्डी येथील श्रमशक्ती भवन येथे ज्येष्ठ समाजवादी नेते कै. भाई वैद्य यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सर्वच स्तरातील कार्यकर्त्यांनी वैद्य यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली. तसेच त्यांनी घालून दिलेली पायवाट पुढे नेण्याचे काम अविरतपणे करण्याचा संकल्प केला.
या सभेच्या अध्यक्षस्थानी स्वराज अभियान महाराष्ट्राचे प्रमुख मानव कांबळे होते. यावेळी जेष्ठ नेते मधू जोशी, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, बजाज ऑटो संघटनेचे दिलीप पवार, नामदेव सोनवणे, अरुण बकाल, डीवायएफआयचे गणेश दराडे, बाबा मोहिते, प्रदीप पवार, गिरिधारी लड्डा आदी उपस्थित होते.
मानव कांबळे यानीं भाईंच्या सहवासातील दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. भाईंच्या जाण्याने न भरून निघणारे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
मधू जोशी म्हणाले, “मानवी जीवनात अनेक लोक काम करतात. मात्र फोटोच्या चौकटीत आल्यावरच का त्यांची आठवण होते. हयात असतानाही तेवढेच प्रेम केले पाहिजे.”
यावेळी राजाभाऊ गोलांडे यांनीही मनोगत व्यक्त केले.