मुंबई, दि. १२ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत मत विभाजन टाळण्यासाठी मनसेने एकत्र यायला हवे. एखाद-दुसऱ्या जागेसाठी जास्त ताणून धरु नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांचे गैरसमज दूर केले जातील, असेही पवारांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
लोकसभेत भाजप-शिवसेनेचा पराभव करायचा असेल, तर धर्मनिरपेक्ष विचारधारा ठेवून एकत्र आले पाहिजे. मनसेनेही मागील वेळी एक लाख मते घेतली होती. त्यामुळे माझे वैयक्तिक मत आहे की, मागच्या गोष्टी मागे सारुन मतविभाजन टाळण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे, असे पवार म्हणाले.
शिवसेना आणि भाजप युती होणार हे नक्की आहे. हे दबावाचे राजकारण आहे. बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी चर्चांचे सत्र सुरु आहे. ते हा मुद्दा ताणतील पण तुटू देणार नाहीत, असेही पवारांनी युतीवर भाष्य केले.