महाराणी ताराराणीबाबत जैन मुनींच्या वक्तव्याला संभाजी ब्रिगेडचा आक्षेप

0
3

केलेल्या विधानावर माफीची सतीश काळे यांची मागणी

दि.०२(पीसीबी) – महाराणी ताराराणी जैन महाराणी होत्या असे जैन मुनी नयन पद्मसागर यांनी केलेल्या वक्तव्याला पिंपरी चिंचवड संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. जैन मुनींचे हे वक्तव्य भावना दुखावणारे असून त्यामध्ये तत्काळ दुरुस्ती करून महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केली आहे. काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे कि, जैन मुनी पद्मसागर यांनी नुकतेच एक विधान केले छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर औरंगजेबने अमानुष अत्याचार केल्यानंतर जैन महाराणी तारादेवींचा उदय झाला त्यांनी मुघल सत्तेला पराभूत केले असे विधान जैन मुनी पद्मसागर यांनी केले. या वक्तव्यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला.

काळे म्हणाले की महाराणी ताराराणी या हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा होत्या. त्यामुळे त्या कोणत्या कुळातील आहेत हे नव्याने सांगण्याची गरज नाही. ताराराणी जैन असल्याबाबत इतिहासात अशा प्रकारचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. महाराणी ताराबाई या पराक्रमी योद्धा होत्या त्यांच्या कार्याबाबत चुकीची माहिती पसरवणे योग्य नाही.
जैन धर्म हा सत्य, अहिंसा आणि शांततेचा संदेश देणारा धर्म आहे. त्यामुळे अशा प्रकारची विधाने करून समाजात गैरसमज पसरवू नयेत असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, संबंधित जैन मुनींचे वक्तव्य भावना दुखावणारे असल्याचा आरोप करत त्यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अशी मागणीही संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे..