शिवरायांचे सर्व किल्ले आम्ही अतिक्रमणमुक्त करू-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

2 Min Read

दि.१९(पीसीबी)-अजितदादांचं शिवनेरीवर प्रचंड प्रेम होतं, मागच्या काळात आम्ही घोषणा केली होती की, महाराष्ट्रातील शिवरायांचे सर्व किल्ले आम्ही अतिक्रमणमुक्त करू. मला सांगताना आनंद वाटतोय की, पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले आता अतिक्रमणमुक्त झाले आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा 396 वा जन्मोत्सव सोहळा शिवनेरी येथे पार पडला. या कार्यक्रमातून ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भारताचा भूगोल यापैकी काही राहिले नसते. खऱ्या अर्थाने ज्या काळात हिंदुस्थानात अनेक राजे आणि राजवाडे मोघलांचं मंडलिकत्व स्वीकारून काम करत होते, अशा परिस्थितीत आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवलं. हे घडवताना त्यांना सांगितले की, तुम्हाला हिंदुस्थानाला मोघलांच्या जोखडातून मुक्त करायचे आहे आणि रयतेचे राज्य स्थापित करायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून एक फौज तयार केली. त्या फौजेने खऱ्या स्वराज्याची स्थापना केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले की, हे माझे राज्य नाही तर रयतेचे राज्य आहे. तुम्ही जे लढत आहात, ते मला राजा बनवण्यासाठी लढत नाही. तुम्ही जे लढत आहात ते देव, देश आणि धर्माकरिता लढत आहात, असे त्यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, भारताच्या इतिहासात पहिले राजे होते की, ज्यांनी ओळखले आपला पुढचा शत्रू हा समुद्राच्या मार्गाने येणार आहे. त्यामुळे जलदुर्ग बांधून पश्चिम किनाऱ्याला संरक्षित करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. पहिल्यांदा पोर्तुगीजांचा पराभव केल्यानंतर जोपर्यंत छत्रपतींचं शासन होतं, तोपर्यंत समुद्री मार्गे येण्याची हिंमत कुठल्याच देशाच्या आक्रमकांनी केली नाही.

अजितदादांचं शिवनेरीवर प्रचंड प्रेम होतं
छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून नॉमिनेट केले आणि जगातील 27 देशांनी एकमताने मतदान करून त्याला मान्यता दिली. मला या गोष्टीचा अभिमान आहे की, अजितदादांचं शिवनेरीवर प्रचंड प्रेम होतं, मागच्या काळात आम्ही घोषणा केली होती की, महाराष्ट्रातील शिवरायांचे सर्व किल्ले आम्ही अतिक्रमणमुक्त करू. मला सांगताना आनंद वाटतोय की अजित दादांच्या इच्छेनुसार पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले आता अतिक्रमणमुक्त झाले आहेत. एकाही किल्ल्यावर आता अतिक्रमण नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच 2030 ला 400 वी शिवजयंती आपण भव्य दिव्य स्वरूपात साजरी करु, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Share This Article