दि.०९(पीसीबी)-अजित पवारांच्या विमान अपघातानंतर सध्या सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले आहे. यामध्ये दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या बारामती येथील निवासस्थानाबाहेर आढळलेल्या कथित जादूटोण्याच्या प्रकाराची चर्चा अग्रस्थानी आहे. २८ जानेवारी रोजी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यापूर्वी डिसेंबर महिन्यात बारामतीतील सहयोग सोसायटीबाहेर लिंबू, नारळ, मिरची, हळदी कुंकू यांसारख्या वस्तू आढळल्या होत्या. यामुळे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जादूटोणा केल्याच्या चर्चा सुरू होत्या.
आता सोशल मीडियात या जादूटोण्याचा संबंध अजित पवारांच्या अपघाती निधनाशी जोडला जात आहे. मात्र, शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी या सर्व चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. पवार कुटुंबीय अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत नाहीत. अजित पवारांनी कधीही अशा गोष्टींना खतपाणी घातले नाही. त्यांच्या हातात कधी ग्रहांची अंगठीही नव्हती, असे काकडे यांनी नमूद केले. विमान अपघाताचा आणि त्या घटनेचा कोणताही संबंध जोडणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अपघातग्रस्त विमानातील वैमानिकांच्या ५० कोटींच्या विमा दाव्याचीही चर्चा सुरू असून, या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी सुरू आहे.







































