दफनभूमी रहिवासी परिसरात नको – भाजप आमदार उमाताई खापरे

0
7

दफनभूमी आरक्षण रद्द न केल्यास तीव्र आंदोलन – जयदीप गिरीश खापरे

पिंपरी, दि. २९ ( पीसीबी ) – विकास आराखड्यातील आरक्षणे चुकीची असल्याने शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दोन दिवसापूर्वी तो रद्द करण्याची मागणी केली, आता भाजप विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नुकताच प्रारूप विकास आराखडा जाहीर केला आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक १९ मध्ये आरक्षण क्रमांक २६०, २६२ व २६४ येथे दफनभूमीचे आरक्षण सुचविण्यात आले आहे. हे आरक्षण शाळा आणि रहिवासी परिसरालगत असल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्यामुळे त्रास होऊ शकतो. तसेच लिंक रोड, भाटनगर येथे असणाऱ्या दफनभूमी पेक्षा चौपट मोठ्या आकाराची जागा आरक्षित करण्याचा घाट पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने घातला आहे. याला चिंचवड, तानाजी नगर, लिंक रोड परिसरातील सर्व सोसायटीतील नागरिकांची तीव्र हरकत असल्याचे पत्र आमदार उमा खापरे यांनी आयुक्त शेखर सिंह यांना दिले आहे.
शुक्रवारी ऑटो क्लस्टर येथे झालेल्या बैठकीत आमदार उमा खापरे यांच्या समवेत उपस्थित २५० पेक्षा जास्त नागरिकांनी लेखी स्वरूपात हरकती दाखल केल्या. यावेळी चिंचवड, प्राधिकरण भाजपा मंडळ अध्यक्ष जयदीप गिरीश खापरे, साई उद्यान सोसायटी, लाईफस्टाईल सोसायटी, संत गार्डन गृहनिर्माण सहकारी संस्था, भक्ती पॅराडाईज सोसायटी, यशोपुरम सोसायटी, देवी लिंक सोसायटी आदी सोसायटीमधील प्रतिनिधी तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
यावेळी चिंचवड, प्राधिकरण भाजपा मंडळ अध्यक्ष जयदीप खापरे यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यात प्रभाग क्रमांक १९ मध्ये आरक्षण क्रमांक २६०, २६२ आणि २६४ येथे दफनभूमीचे आरक्षण दर्शविण्यात आले आहे. हे दफनभूमीचे आरक्षण शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात आणि पवित्र पवना नदी तीरावर आहे. यामुळे नदी प्रदूषण होऊन, आजूबाजूच्या परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच या नियोजित आरक्षणात गरजेपेक्षा खूपच जास्त जागा दर्शविण्यात आली आहे. तरी आयुक्त शेखर सिंह यांनी हे दफन भूमीचे आरक्षण रद्द करून येथे इतर सार्वजनिक सेवा, सुविधा यासाठी ही जागा वापरून येथील नागरिकांना दिलासा द्यावा. अन्यथा चिंचवड प्राधिकरण भाजप मंडळ तसेच लिंक रोड, चिंचवड परिसरातील नागरिकांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा जयदीप गिरीश खापरे यांनी दिला आहे.