डॉ. आंबेडकर स्मारकामागील पोलीस स्टेशनचे आरक्षण तत्काळ रद्द करा, अन्यथा तीव्र जनआंदोलन ! – सिमा सावळे यांचा प्रशासनाला इशारा

0
5

पिंपरी, दि.२३ : पिंपरी-चिंचवड शहराच्या हृदयस्थानी असलेल्या आणि समस्त आंबेडकर अनुयायांसाठी श्रध्देचे केंद्रबिंदू ठरलेल्या महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील ‘भीमसृष्टी मैदान’ आता धोक्यात आलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या सुधारित विकास आराखड्यात या मैदानावर चक्क पोलीस स्टेशन, मनपा उपयोग आणि बस टर्मिनसचे आरक्षण टाकले आहे. याठिकाणी आरक्षण टाकून प्रशासनाने शहरातील आंबेडकर अनुयायांच्या भावनांवर क्रूर हल्ला केला आहे. माजी स्थायी समिती अध्यक्षा सिमा सावळे यांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणत मनपाच्या या अन्यायकारक कृतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्सव म्हणजे केवळ एक सोहळा नाही, तर तो विचार, प्रेरणा आणि एकजुटीचा महामेळावा आहे. संपूर्ण शहरातून काढण्यात येणाऱ्या मिरवणुका याच भीमसृष्टी मैदानावर एकत्र येतात, जिथे ज्ञानाचा प्रकाश देणारी प्रबोधनात्मक व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी आठवडाभर परिसर भारलेला असतो. हजारो नागरिक, बालकांपासून वृद्धांपर्यंत, मोठ्या उत्साहात यात सहभागी होतात. इतर वेळा वर्षभरात याच मैदानावर अनेक सामाजिक, राजकीय सभा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात, जिथे अनेक दिग्गजांनी आपले विचार मांडले आहेत. हे मैदान म्हणजे आंबेडकरी चळवळीची आणि पिंपरी-चिंचवडच्या सामाजिक एकोप्याची जिवंत साक्ष आहे. “डॉ. आंबेडकर अनुयायांना या महामानवाला अभिवादन करण्यासाठी शहरात एकच जागा उपलब्ध होती. सुधारित विकास आराखड्याच्या माध्यमातून ती देखील हिसकावण्याचा हा षडयंत्रपूर्वक डाव आखण्यात आला आहे. विशेषतः या ऐतिहासिक जागेवर मुद्दाम पोलीस स्टेशनचे आरक्षण लादून सर्व आंबेडकरी जनतेचा घोर अपमान करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी जागाच मिळू नये, असा हा नीच कट आहे, असे सिमा सावळे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत आपला संताप व्यक्त करत म्हटले आहे, “
प्रशासनाने तत्काळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील भीमसृष्टी मैदानावर टाकलेली सर्व आरक्षणे रद्द करावीत आणि याठिकाणी ‘भीमसृष्टी मैदान’ हे आरक्षण प्रस्तावित करावे, अशी मागणी सिमा सावळे यांनी केली आहे. अन्यथा, या अन्यायाविरुद्ध मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आंबेडकरी जनता आपला स्वाभिमान आणि आपल्या महामानवाच्या स्मृती जतन करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्यास तयार आहे, असा निर्धार सावळे यांनी व्यक्त केला आहे.