‘वयस्कर लोकांच्या समस्यांसंदर्भात उपायोजना करण्याची गरज’

0
24

दि. १५ ( पीसीबी ) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकेडे, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी येथे हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी फाऊंडेशनद्वारे निर्मित व संचालित ‘मिलन’ वृद्धाश्रमाचे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आनंदही व्हावा आणि खंतही वाटावी अशाप्रकारचे काही कार्यक्रम असतात. आनंद यासाठी की, महाराष्ट्रातील पहिल्या 4 ते 5 वृद्धाश्रमात गणना व्हावी असा वृद्धाश्रम डॉ. जलील पारकर यांनी याठिकाणी तयार केला आहे. खंत याची की, अलीकडच्या काळामध्ये कुटुंबातील ओलावा कमी झाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृद्धाश्रमांची गरज भासायला लागली, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या देशात कुटुंब संस्कृती इतकी उत्तम होती की वृद्धाश्रम ही संकल्पनाही बराच काळ नव्हती. पण समाज जेव्हा एखादे आव्हान उभे करतो, त्यावेळी त्या आव्हानाचा सामना करण्याकरिता डॉ. पारकर यांच्यासारखे कुणीतरी पुढे येते आणि व्यवस्था उभे करते. डॉ. पारकर कोव्हिडमुळे आजारी असतानादेखील त्यांनी जी रुग्णसेवा केली, ती अतिशय वाखाणण्यासारखी आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या देशाचे येणाऱ्या 20 वर्षांनी सरासरी वय हे 85 वर्ष होणार आहे. 2035 नंतर आपल्याकडे वयस्कर लोकांची संख्या दरवर्षी वाढत जाणार आहे. आपल्याला देश म्हणून, राज्य म्हणून, वयस्कर लोकांच्या समस्या, त्यांच्या संदर्भातल्या उपाययोजना या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री योगेश कदम, खा. सुनिल तटकरे, आ. प्रसाद लाड, हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी फाऊंडेशनचे विश्वस्त, पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.