अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांवरील अन्याय थांबविण्यासाठी थेट राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार

0
214

शहरातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना सोईसुविधा मिळण्यासाठी राष्ट्रवादीचे इखलास सय्यद यांची मागणी

पिंपरी दि.०३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उर्दु शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अपुऱ्या सोयीसुविधा व असंख्य तक्रारी असुन देखील महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने याची तक्रार थेट राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाकडे करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे पिंपरी विधानसभेचे कार्याध्यक्ष इखलास सय्यद यांनी आयोगाचे अध्यक्ष यांना या विद्यार्थ्यांच्या विविध समस्या व प्रश्नांबाबत निवेदन दिले आहे.

इखलास सय्यद यांनी राष्ट्रीय आयोगाला दिलेल्या निवेदनात असे म्हणले आहे की, “पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळ (महाराष्ट्र पुणे) अंर्तगत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यासाठी उर्दू भाषेच्या शाळा चालविण्यात येत असुन या सर्व शाळांमध्ये उर्दू प्राथमिकचे १४ वर्ग असून सुमारे ४ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्यासाठी केवळ १०२ शिक्षक यासाठी कार्यरत आहेत.

तर उर्दू माध्यमिक विभागाच्या ५ शाळां मधून सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांकरीता ५० माध्यमिक शिक्षक कार्यरत आहेत. यावरूनच निदर्शनात येते की, विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षक संख्या अत्यल्प आहेत. त्यामुळे उर्दु शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. एवढेच नव्हे तर, पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी येथील स्व. फकिरभाई पानसरे या उर्दू शाळेची अवस्था तर अधिकच दयनिय आहे कारण, येथील प्राथमिक शाळेत सुमारे ६४० विद्यार्थी शिक्षण घेत असून तेथे फक्त ९ शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षण कसे घ्यावे ? हा गंभीर प्रश्न आहे.

आकुर्डी येथील उर्दू शाळेचा हॉल एका खाजगी क्रीडा संस्थेस भाड्याने दिला असल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारामध्ये (व्हरंड्यात) बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. वस्तुय: पिंपरी चिंचवड महापालिका अद्यादेश (pcmc/GR/ जा.क्र./ शिक्षण साक्ष/७५ कावि/३२/२०२० दिनांक२० जुलै २०२२) च्या आदेशानुसार शिक्षण संस्थेतील कोणताही खाजगी हॉल इतर कोणत्याही खाजगी संस्थेस भाड्याने देऊ नये, असा अद्यादेश असूनही महापालिका अधिकाऱ्यांशी संगनमताने सदर उर्दू शाळेचा हॉल भाड्याने दिला आहे. त्यामुळे पालकसभा, सांस्कृतिक कार्यक्रम व शैक्षणिक प्रक्षिशण असे उपक्रम घेता येत नाही, तसेच शिक्षकांसाठी स्टॉफ रूम, विद्यार्थ्यासाठी प्रयोग शाळाही उपलब्ध नाही, तसेच स्वच्छतागृह अपुरे असून ते अस्वच्छ असते, तर त्याच शेजारी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असल्याने दुर्गंधीयुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना पाणी प्यावे लागते तसेच वर्ग खोल्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून दरवाजे देखील मोडकळीस आले आहे, त्याच बरोबर उर्दू माध्यमिक शाळेचीही दुरावस्था यापेक्षा वेगळी नाही. सदर इमारत ५० वर्षे जुनी असल्याने मोडकळीस आली आहे. तेथे १८ वर्ग खोल्या असून ५७५ विद्यार्थ्यासाठी फक्त १० वर्ग खोल्या असून एकाच वर्ग खोलीला दोन तुकड्या पूर्व-पश्चिम असे बसून विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यासाठी समोरा-समोरील भिंती वर फळे लावलेले आहेत. शिक्षक संख्या अपुरी, प्रयोग शाळेच्या खोलीत इतर साहित्य ठेवल्याने ती खोली प्रयोग शाळेची की अडगळीचे साहित्य ठेवण्याची? हाच प्रश्न पडतो. येथेही स्टॉफ रूम नाही, स्वच्छतागृह दोनच अशी परिस्थिती आहे.

तसेच गेली ५ वर्षापासून शासनाकडुन घेण्यात येणारे CET/WET परीक्षेतील पात्र शिक्षकांची नेमणुका रेस्टरच्या अपूर्ण- तेचा घोळाचा संदर्भ देत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची विल्हेवाट लावण्याचा मनपा अधिकान्यांकडून सुयोनियोजित कर रचल्याचे दिसते, याबाबत शाळेचे मुख्याध्यापक व मी स्वतः महापालिकेला पत्राव्दारे कळविले आहे. त्यासही एक वर्ष होऊन गेले. केवळ अल्पसंख्यांकाची शाळा म्हणून महापालिका व शिक्षणमंडळ या दोघांकडून सोयिस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे म्हणूनच शेवटी आपणांकडे धाव घेऊन सदर निवेदन पत्र आपणांस पाठवित आहे. कृपया योग्य दखल घेऊन कार्यवाही करण्यात यावी असे त्यात नमूद केले आहे.