… तर पोहचाल यशोशिखरावर – डॉ. गोविंद कुलकर्णी

0
245


-पीसीसीओईच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात

पिंपरी,दि. २२ (पीसीबी) – विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अभियांत्रिकी विद्याशाखेत प्रवेश घेतला आहे. या चार वर्षाच्या काळात भरपूर कष्ट करा; त्यानंतर पुढील आयुष्यात तुम्ही यशोशिखरावर पोहोचाल याची खात्री बाळगा, असा संदेश पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

पीसीईटीच्या वतीने पीसीसीओईच्या २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षासाठी अभियांत्रिकी विद्या शाखेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभ आयोजित केला होता. यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांना तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम दोन सत्रांमध्ये आकुर्डी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर सभागृहात झाला. यावेळी डॉ. कुलकर्णी बोलत होते. कार्यक्रमास पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे, डॉ. संजीवनी सोनार, पीसीसीओईच्या आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या अधिष्ठाता डॉ. रोशनी राऊत, डॉ. लीना शर्मा, डॉ. सोनाली पाटील, डॉ. राजीव नगरकर आदी उपस्थित होते.

डॉ. देसाई म्हणाले की, सुसंस्कारित अभियंते आणि देशाचे नागरिक घडविण्याचा वसा पीसीईटीच्या अंतर्गत संकुलातील शैक्षणिक संस्थांनी घेतला आहे. संस्कारीत अभियंते तयार करण्याचे काम पीसीसीओई मध्ये केले जात आहे. तुम्हाला मिळालेल्या संधीचे सोने करा. अडचणी अनेक प्रकारे येतात, परंतु त्या अडचणींना सामोरे जा. त्यातूनच तुम्हाला यश मिळेल. अडचणींचा सामना केल्याने धैर्य, खंबीरपणा निर्माण होऊन यशस्वी अभियंते म्हणून नावलौकिक मिळेल.

डॉ‌. चोपडे म्हणाले, तुम्ही चार वर्षांनी अभियांत्रिकीची पदवी घेऊन बाहेर पडाल. पुढील वाटचाल करताना या ज्ञानाचा, अनुभवाचा खूप उपयोग होईल. चार वर्षांच्या शैक्षणिक कालावधीत तुमचा सर्वांगीण विकास झालेला असेल याबाबत विद्यार्थी तसेच पालकांनी ही खात्री बाळगावी.डॉ. रवंदळे म्हणाले की, अभियांत्रिकीचे आठ सत्र आहेत. पहिल्या सहा सत्रांमध्ये अपार कष्ट घेतले तर, पुढील दोन सत्रात तुम्ही यशाकडे वाटचाल करताना स्वतःला सिद्ध कराल, असे डॉ. रवंदळे यांनी सांगितले.
यावेळी डॉ. संजीवनी सोनार, प्रथम वर्ष विभाग प्रमुख म्हणाल्या की, तुम्ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना कुठलेही दडपण घेऊ नका. शिक्षण घेताना जो अनुभव मिळेल तोच तुम्हाला पुढील जीवनात खंबीरपणे उभे राहण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. प्रामाणिकपणे कष्ट करा, उचित धेय्य गाठण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करा.

डॉ. शीतल भंडारी, डॉ. अनुराधा ठाकरे यांनी विद्यार्थी तसेच पालकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले व मार्गदर्शन केले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर,खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त आणि पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे , अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते