राज-उध्दव लवकरच एकत्र येणार ?

0
156

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – अजित पवारांच्या बंडानंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावेत, अशी चर्चा सुरु आहे.’राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे,’ असे फलकही अनेक ठिकाणी झळकले होते. हे दोन भाऊ खरंच एकत्र येणार का? याबाबत उद्धव ठाकरेंनी आज रोखठोक उत्तर दिले.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग आज (गुरुवारी) प्रसिद्ध करण्यात आला. राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीबाबत राऊतांनी त्यांना प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

राऊतांनी “राज ठाकरे आणि तुम्ही एकत्र येणार असल्याची चर्चा होती. त्याला काही आधार आहे काय?’ असा प्रश्न उद्धव ठाकरेंना केला. त्यावर उद्धव ठाकरेंनी सूचक उत्तर दिले. ते म्हणाले, ” युतीबाबतच्या चर्चांना आधार असता तर चर्चा थांबली नसती ना…तुम्हीच सांगितलं चर्चा झाली आणि चर्चा थांबली. आता ज्यांनी कुणी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असेल त्याला आधार मिळाला नसेल म्हणून चर्चा थांबली असावी,”

युतीबाबत मनसेकडून चर्चेचा प्रस्ताव आला तर काय कराल? या प्रश्न राऊतांनी ठाकरेंना विचारला. त्यावर ते म्हणाले, “प्रस्ताव आला तर… गेला तर… याच्यावर मी कधी विचार करीत नाही. त्या क्षणाला काय असतं त्याचा विचार करतो. मी आणि राज ठाकरे एकत्र येणार या चर्चेला आधार असता, तर माध्यमांमधील चर्चा थांबली नसती. चर्चा झाली आणि चर्चा थांबली. ज्याने चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्याला आधार मिळाला नाही, त्यामुळे ती चर्चा थांबली असेल.”

“मी प्रस्ताव आला तर, गेला तर यावर विचार करत नाही”
असा प्रस्ताव आला तर? असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला. त्यावर उद्धव ठाकरेंनी स्पष्ट भूमिका घेतली. “मी प्रस्ताव आला तर, गेला तर यावर विचार करत नाही. गेला तरी विचार करत नाही आणि आला तरी मी त्यावर विचार करत नाही. त्या क्षणाला काय असतं त्याचा विचार करतो. त्यामुळे आत्ता तरी तशी काही चर्चा नाही. त्यामुळे त्यावर काही बोलण्याची आवश्यकता नाही,” असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.

“त्यांना मोठं करणारी माणसं माझ्याबरोबर”
शिवसेनेतून मोठ्या प्रमाणावर माणसं बाहेर पडल्याबाबत संजय राऊतांनी विचारणा करताच उद्धव ठाकरेंनी त्यावरून टोला लगावला. “मोठे लोक बाहेर नाही पडले. तथाकथित मोठी माणसं बाहेर पडली. पण ज्यांनी त्यांना मोठं केलं ती माणसं माझ्यासोबत आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंप्रमाणे शरद पवार कायदेशीर लढाई करत नाहीत?
शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी कायदेशीर लढा दिला. मात्र, शरद पवारांनी वेगळा मार्ग निवडल्याबाबत विचारणा केली असता उद्धव ठाकरेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली. “ज्याचा त्याचा मार्ग असतो. मी शिवसेना प्रमुखांच्या मार्गाने चालणारा आहे. त्यामुळे जशास तसं उत्तर देणारा, आरेला कारे करणारा मी आहे. त्यामुळे मी लढतोय. शरद पवारांची विचारधारा वेगळी आहे. ते त्यांच्या पद्धतीने जाऊ इच्छित असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे”, असं ते म्हणाले