मराठा आरक्षणासाठी हजारोंच्या संख्येने मराठे मुंबईत होणार दाखल

bpcauthor bpcauthor
2 Min Read

मुंबई,दि.१६(पीसीबी) – मराठा वनवास यात्रा गेल्या महिनाभरापासून आझाद मैदानावर पावसात बसलेली आहे. दोन तीन दिवसांपासून पोलिसांनी आंदोलन कर्त्यांवर केलेल्या अत्याचारामुळे मराठा समाजात फार मोठी चीड निर्माण झाली आहे. ज्या कोपर्डीच्या घटनेमुळे महाराष्ट्रात क्रांतीची ठिणगी पडली. त्या भगिनीच्या स्मृती दिनीच आंदोलकांना धरपकड करून डांबून ठेवल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून रोष व्यक्त केला जात आहे. मराठा वनवास यात्रेला समर्थन म्हणून येत्या 17 तारखेला सोमवारी हजारों मराठा बांधव मुंबई मध्ये दाखल होणार आहेत. विविध मराठा संघटनांचा पाठिंबा मिळत असल्याने आंदोलनाची ठिणगी पडली असल्याचे दिसून येत आहे.

या ठिणगीचे वणव्यात रूपांतर होण्याच्या आधी मराठा समाजाच्या मागण्या मंजूर करण्यात याव्यात. जर चर्चाच करायची असेल तर मुख्यमंत्र्यांनी आझाद मैदानात आले पाहिजे अशी ठाम भूमिका वनवास यात्रेचे संयोजक योगेश केदार यांनी घेतलेली आहे. मराठ्यांना संविधानाच्या चौकटीत टिकणारे तसेच राज्यसरकारच्या अखत्यारीत असणारे ओबीसी आरक्षण द्यावे यासाठी ही वनवास यात्रा आहे. गेल्या दोन अडीच महिन्यांपासून गावोगावी जाऊन जनजागृती केली गेली आहे. दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणा बाबत जनजागृती करत आहे. कितीही जुलूम जबरदस्ती केली तरी आम्ही मैदान सोडणार नाही असा पवित्रा वनवास यात्रेच्या संयोजकांनी घेतलेला आहे.

केवळ 17% लिंगायत समाजाने कर्नाटक मध्ये भाजपचे सरकार घालवले. जर का 32% मराठा समाजाने एखाद्या पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली तर सत्ताधाऱ्यांची पळता भुई थोडी होईल. जो पक्ष आणि नेता मराठ्यांच्या ओबीसी आरक्षण मागणीचा विरोध करेल त्यांच्या विरोधात संपूर्ण मराठा समाज काम करेल आणि निवडणुकीत धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. त्यामुळे आत्ताच्या सत्ताधारी पक्षाने मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ अशी मागणी मराठा वनवास यात्रेचे समन्वयक सतीश काळे यांनी केली आहे. तसेच सोमवारी हजारोंच्या संख्येने आझाद मैदान मुंबई येथे उपस्थित रहाण्याचे आवाहन सतीश काळे यांनी केले आहे.

Share This Article